ताज्या घडामोडी

  • Home
  • ताज्या घडामोडी

हा कसला आत्मनिर्भर भारत? साखर दरवाढीवरून मल्लिकार्जुन खरगे यांचा सरकारवर निशाणा

22-08-2026

सणासुदीच्या तोंडावर देशात साखरेचा तुटवडा आणि दरवाढ झाल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या धोरमांमधील कडवटपणामुळे सणांआधीच साखरेचा गोडवा निघून गेला आहे, अशी टीका खर्गे यांनी सोशल मीडियावर केली.‌
साखरेच्या मुद्द्यावरून खर्गे यांनी सरकारसमोर तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. "जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या भारतात साखरेचा साठा गेल्या ९ वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर कसा पोहोचला? साखर निर्यात रोखून १ लाख टन साखर विनाशुल्क आयात का करावी लागत आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, गेल्या ३ महिन्यांत साखरेच्या किमती तब्बल ४० टक्क्यांनी वाढल्याने जनतेवर आर्थिक बोजा पडल्याचे त्यांनी नमूद केले. "आत्मनिर्भर भारताच्या गप्पा मारणारे सरकार एकीकडे साखर आयात करत आहे आणि दुसरीकडे ऊस इथेनॉलसाठी वापरत आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हटले की, साखरेचे दर आणि आयातीचा संबंध सरकारच्या E20 धोरणाशी जोडणे ही केवळ काँग्रेसची राजकीय सोय आहे.

चूक होत असते, ती दुरुस्त करा - मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

22-08-2026

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील वातावरण पेटलेले असतानाच, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. २९ ऑगस्टच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांनंतर झालेल्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या भेटीदरम्यान जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत सत्तारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. "चूक होत असते, ती दुरुस्त करा," असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. त्यावर सत्तार यांनी "मी मित्र म्हणून आलो असून सरकार समाजाबाबत सकारात्मक आहे, संघर्ष टाळावा," अशी विनंती केली.
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीतच उपोषणाला बसणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सरकारने मागण्या मान्य न केल्यास उपोषण सुरू असतानाच थेट मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

GenZ ना आकर्षित करण्यासाठी भाजप काँग्रेसमध्ये रस्सीखेच

22-08-2026

नीट पेपर फुटी प्रकरणानंतर, आणि GenZ यांच्या जंतर-मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर राजकारण्यांनी Gen Z च्या प्रश्नांकडे मोर्चा वळवला आहे. GENz विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज कार्यक्रम हाती घेतला.. याचाच भाग म्हणून राहुल गांधी आज पुण्यात दाखल झाले आहेत.
राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमावर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी, राहुल गांधींचा कार्यक्रम हा पैसो की गुंज आहे.गर्दी जमवण्यासाठी दहा कोटींचा खेळ केला आहे. 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटल्याचा आरोप केला आहे. तर बन यांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेत या आरोपाची चौकशी केली जाईल असे म्हटले. भाजपच्या या आरोपांवर, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम बाळगावी.‌ भाजपला राहुल गांधींच्या कार्यक्रमाची धास्ती आहे असं म्हणत पलटवार केला.
या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री, Corp कॉलेजमध्ये ABVP आणि NSUI च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली.. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. झालेल्या प्रकारावर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला, भाजपकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडणं म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे. यावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले पुण्यातील रात्रीचा राडा हा
काँग्रेसचा इव्हेंट. काँग्रेसने ठरवून गोंधळ घातला..
यामुळे राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात GenZ सोबत संवाद साधणार आहेत. यामुळे Gen Z ची मतपेढी आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजपकडून होत आहे. Gen Z चा‌ कौल कोणाला हे येणारा काळच सांगेल.

शीखविरोधी दंगल प्रकरणातील दोषी काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांचे तिहार तुरुंगात निधन....

21-08-2026

१९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील दोषी आणि काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे वयाच्या 80 व्या वर्षी आज निधन झाले. दिल्लीतील तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सज्जन कुमार यांनी १९७७ मध्ये नगरसेवक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. १९८० मध्ये ते बाह्य दिल्लीतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. पुढे १९९१ आणि २००४ मध्येही त्यांनी खासदारकी भूषवली.
मात्र, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील भूमिकेमुळे त्यांचे राजकीय जीवनावर विपरीत परिणाम झाला. दिल्ली कॅन्टोन्मेंट आणि सरस्वती विहार परिसरातील हिंसाचार आणि हत्यांप्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर २०१८ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. दंगलीशी संबंधित दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ते दोषी ठरले होते, तर एका प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.

राहुल गांधी पुणे दौऱ्यापूर्वीच काँग्रेस-भाजप आमने-सामने

21-08-2026

लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी 22 ऑगस्ट ला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याला आवाज देण्यासाठी छात्रों की गुंज हा कार्यक्रम सुरू केला होता, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे. येत्या 22 ऑगस्टला, छात्रों की गुंज चा कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे शहरात होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे जिजाऊंचं, अहिल्याबाईंचं आणि रमाई यांचा आहे. या कार्यक्रमाच वेगळेपण हे की छात्रों की गुंजच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकी विद्यार्थिनींशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी दिली. यावेळी 25000 विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत.
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका करत म्हणाले की, सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. काँग्रेस नेते संचलित जी काही महाविद्यालय आहेत त्यापैकीच विद्यार्थींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा प्रकारचे आदेश आहेत.
पत्रकार परिषदेवेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि आमदार सतेज पाटील यांनी, रजिस्ट्रेशन सर्वांसाठी खुलं आहे हे स्पष्ट केले. या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी करत काँग्रेसकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी राहुल गांधींना कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

View All the Podcast Episodes today!

Sakalaam Youtube Channel
img